मराठी व्याकरण वृत्ते – Marath Grammar reports

वृत्ते मराठी व्याकरण Marath Grammar reports

प्रत्येकी तीन तीन अक्षरांचे आठ गण तयार करून त्यांची लयबद्ध आविष्करणे केली जातात त्यांना वृत्ते (किंवा अक्षरगणवृत्ते म्हणतात ह्यांचाच विचार इथे करावयाचा आहे.

vrutte marathi vyakran

अक्षर-गण-वृत्ते म्हणजे लघु-गुरुअक्षरांचे साचेबद्ध आणि व्याकरणनिष्ठ आविष्कार असतात. अक्षरगणवृत्तात लघु म्हणजे र्‍हस्व उच्चार होणारी अक्षरे आणि गुरू म्हणजे दीर्घ उच्चार होणारी अक्षरे असतात. त्यांचा क्रम, रचनेतल्या प्रत्येक ओळीत पाळण्याचा नियम आहे. यामध्ये एकूण ४ ओळींच्या कडव्यामधील, ४ ही ओळींची गणरचना एकसारखी असते त्यास समवृत्त, २ ओळींची एकसारखी असते त्यास अर्धसमवृत्त अथवा सर्वच ओळींची वेगळी असू शकते त्यास विषमवृत्त म्हणतात. गण म्हणजे तीन अक्षरांचा एक गट असतो. असे एकूण आठ गण आहेत. त्यातील गणांची नावे आणि गणांतील लघुगुरूक्रम खालील सारणीत दिलेले आहेत.

अक्र
गण
लघुगुरूक्रम
द्विमान
चिन्हांकित
यमाचा
०११
– ऽ ऽ
राधिका
१०१
ऽ – ऽ
ताराप
११०
ऽ ऽ –
नमन
०००
– – –
भास्कर
१००
ऽ – –
जनास
०१०
– ऽ –
समरा
००१
– – ऽ
मानावा
१११
ऽ ऽ ऽ
अक्षरगणवृत्तबद्ध कवितेच्या एका कडव्यात चार ओळी असतात. एका ओळीतील सर्व अक्षरांचे तीन तीनांचे गट पाडायचे. प्रत्येक गटाचा एक गण असतो. मात्र, अक्षरगणवृत्तात बांधलेल्या कवितांच्या ओळींत तीनच्या पटीत न बसणारी अक्षरेही कधी कधी असतात. अशा वेळी शेवटी अधिकतम दोन अक्षरे उरतील. लघु अक्षर उरल्यास त्याचा गण ल आणि गुरू अक्षर उरल्यास त्याचा गण ग धरावा.

36 Vrutte%2B
थोडक्यात काय तर द्विमान गणितातील ००० ते १११ असे हे आठ संयोग आहेत. ० = लघु, १ = गुरू. अक्षरगणांची मांडणी, पारंपारिक यरतनभजसम अशी न करता (०००, ००१, ०१०, ०११, १००, १०१, ११०, १११) अशा प्रकारे नव्या वैज्ञानिक पद्धतीने केल्यास हीच किल्ली “न सजय भरतम” अशी मांडता येईल. (००० ते १११) याचा अर्थ भारत (कधीही) विजयी होणार नाहीअसा निघतो. म्हणूनच कदाचित, पारंपारिक मांडणी यरतनभजसम अशी करत असावेत.

भुजंगप्रयात
लक्षणगीतः
क्रमानेच येती य चारी जयात, म्हणावे तयाला भुजंगप्रयात ।
पदी अक्षरे ज्याचिया येत बारा, रमानायका दुःख माझे निवारा ॥
यमाचा यमाचा यमाचा यमाचा, यमाचा यमाचा यमाचा यमाचा ।
उदाहरणः
रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक ह्याच वृत्तात लिहिले आहेत.
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच सोशित जावे ।
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांस रे नीववावे ॥
विचारून बोले विवंचून चाले, तयाचेनि संतप्त तेही निवाले ।
बरे शोधल्यावीण बोलो नको हो, जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो ॥
कृष्णाजी नारायण आठल्ये ह्यांची प्रख्यात कविता प्रमाण हीही ह्याच वृत्तात लिहिली आहे.
अतीकोपता कार्य जाते लयाला, अती नम्रता पात्र होते भयाला ।

अती काम ते कोणतेही नसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।।

वसंततिलका
वसंत ऋतू म्हणजे कुसुमाकर. त्याचा तिलक म्हणजे वसंततिलक, अर्थात पुष्पगंध. हे मराठीतील एक सुंदर अक्षरगणवृत्त आहे. ह्याच्या प्रत्येक ओळीत १४ अक्षरे आणि त भ ज ज ग ग हे गण येतात. त्यामुळे वृत्ताची चाल ठरलेली असते. 

लक्षणगीतः 
जाणा वसंततिलका व्हय तेचि वृत्त । येती जिथे त भ ज जा ग ग हे सुवृत्त ॥
ताराप भास्कर जनास जनास गा गा । ताराप भास्कर जनास जनास गा गा
उदाहरणः 
कविताः माझे मृत्युपत्र, कवीः स्वातंत्र्यवीर सावरकर
की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने । लब्धप्रकाश इतिहास निसर्गमाने ॥
जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे । बुद्ध्याच वाण धरिले करी हे सतीचे ॥
पञ्चचामर
पञ्चचामर हे १६ अक्षरे प्रत्येक ओळीत असलेले अक्षरगणवृत्त आहे. दर आठ अक्षरांनंतर यती (अल्पविराम) असते. त्यात अनुक्रमे ज र ज र ज ग हे गण येतात. 

लक्षणगीतः 
जरौ जरौ ततो जगौ च पञ्चचामरं वदेत् ।
जनास राधिका जनास राधिका जनास गा । जनास राधिका जनास राधिका जनास गा ॥

उदाहरणः 
रावणविरचित शिवतांडवस्तोत्र हे काव्यही पञ्चचामर वृत्तात बांधलेले आहे.
जटा कटाहसंभ्रम भ्रमन्निलिंपनिर्झरी विलोलवीचिवल्लरी विराजमानमूर्धनि
धगद्धगद्धगज्ज्वल ल्ललाटपट्टपावके  किशोरचंद्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम
जटांतुनी गतीस्थ, गुंतल्या झर्‍यांपरी अहा तरंग ज्याचिया शिरी विराजती, शिवा पहा
ललाट ज्योतदाह ज्या शिवाचिया शिरी वसेकिशोर चंद्रशेखरा-प्रती रुचीहि वाढु दे
शिखरिणी
लक्षणगीतः
यमानासाभाला ग गण पदि येता शिखरिणी ।
यमाचा मानावा नमन समरा भास्कर ल गा ।  यमाचा मानावा नमन समरा भास्कर ल गा ॥
उदाहरणः शुकान्योक्ती, कृष्णशास्त्री चिपळूणकर
तुझी वाणी कोणी म्हणत गुण हा अद्भुत असे ।  मला वाटे मोठा तुजजवळ हा दोषच वसे ॥

शुका तीच्या योगे सतत पिंजर्‍यामाजि पडशी ।  गड्या स्वातंत्र्याच्या अनुपम सुखा सर्व मुकशी ॥ 

मंदाक्रांता
कालीदासाने मेघदूत हे महाकाव्य मंदाक्रांता वृत्तात रचले आहे. पूर्वमेघ (६३) आणि उत्तरमेघ (५४) मिळून, एकूण चार चार ओळींची १२७ कडवी ह्या महाकाव्यात आहेत. रामगिरीवरील आश्रमात शापित यक्ष, अलकापुरीतील आपल्या वास्तव्याची आठवण करत असता, तिथून अलकापुरीस जाणारे मेघ त्याला दिसतात. त्या मेघांतील एकालाच आपला दूत करून त्याचेजवळ आपल्या प्रियतमेस केवळ सजीवाकरवीच पाठवावा असा प्रीतीचा संदेश तो पाठवतो. मेघमार्गावरील, भरतवर्षातील सर्व ठिकाणांची वर्षाकालीन सुंदर वर्णने हे ह्या महाकाव्याचे देखणे अलंकार आहेत. त्या यक्षाला शाप कसा मिळाला, काय मिळाला इथपासून सुरू होणारी काव्यात्मक कथा, मेघाला वर्षावैभव प्राप्त होऊन सौदामिनीसोबत रत होत असता, विरहाची अनुभूती कधीही न येवो अशी कामना यक्ष व्यक्त करतो, तिथवर जाऊन थांबते!
लक्षणगीतः
मंदाक्रांता म्हणति तिजला, वृत्त ते मंद चाले ।
ज्याच्या मध्ये म भ न त त हे आणि गा दोन आले ॥
उदाहरणः
धूमज्योतिः सलिलमरुतां संनिपातः क्व मेघः ।  संदेशार्थाः क्व पटुकरणैः प्राणिभिः प्रापणीयाः ॥
इत्यौत्सुक्यादपरिगणयन्गुह्यकस्तं ययाचे ।  कामार्ता हि प्रकृतिकृपणाश्चेतनाचेतनेषु ॥
– पूर्वमेघ-मेघदूत, कालीदास
म्हणजेच
धूर-ज्वाला-जल-झुळुक ह्यांनीच हा मेघ दाटे ।   प्राण्याद्वारे कळवु शकतो, तोच संदेश हा ने ॥
निर्जीवांची युति असुनही, योजिला दूत कामी ।  प्रेमार्ताला, सजिव नसुनी, भासला मेघ नामी ॥

पृथ्वी
लक्षणगीतः
पदी गण जसा जसा यलग वृत्त पृथ्वी म्हणा ।  पदी गण जसा जसा यलग वृत्त पृथ्वी म्हणा ॥
उदाहरणः
कड्यावरूनिया उड्या धडधडा पये टाकिती ।  करून गुरुगर्जना निकट देश नादावती ॥

दुधापरी जलौघ ते मज बघावया ते कदा ।  फिरून मिळतील गा कधी तरी उदरांबुदा ॥ – भा.रा.तांबे

शार्दूलविक्रीडित
लग्नाची मंगलाष्टके सामान्यतः शार्दूलविक्रीडितात रचली गेलेली असल्याने हे वृत्त सर्वात अधिक लोकप्रिय वृत्त आहे. लग्नात जरी हे वृत्त एका विशिष्ट चालीत म्हणत असले, तरी ह्या वृत्तातली कविता, वृत्ताच्या पारंपारिक लक्षणगीताने व्यक्तवलेल्या चालीतच म्हटली जात असते.
लक्षणगीतः
आहे वृत्त विशाल त्यास म्हणती शार्दूलविक्रीडित
मा सा जा स त ता ग येति गण हे पादास की जोडित
मानावा समरा जनास समरा ताराप ताराप गा
मानावा समरा जनास समरा ताराप ताराप गा
उदाहरणः
सन्तप्तायसि संस्थितस्य पयसो नामापि न ज्ञायते ।
मुक्ताकारतया तदेव नलिनीपत्रस्थितं राजते ॥
स्वात्यां सागरशुक्तिमध्यपतितं तन्मौक्तिकं जायते ।
प्रायेणाधममध्यमोत्तमगुणः संसर्गतो जायते ॥
– नीतिशतक, राजा भर्तृहरी, ख्रिस्तपूर्व-५६
तोयाचे परि नावही नच उरे संतप्त लोहावरी ।
ते भासे नलिनीदलावरि पहा सन्मौक्तिकाचे परी ॥
ते स्वातीस्तव अब्धिशुक्तिपुटकी मोती घडे नेटके ।
जाणा उत्तममध्यमाधमदशा संसर्ग योगे टिके ॥
– नीतिशतकाचा मराठी अनुवादवामन पंडित (वामन नरहरी शेष), ख्रिस्तोत्तर १७-वे शतक

मंदारमाला
लक्षणगीतः
मंदारमाला कवी बोलती हीस, कोणी हिला अश्वघाटी असे ।
साता तकारी जिथे हा घडे पाद, तेथे गुरू एक अंती वसे ॥
ताराप ताराप ताराप ताराप, ताराप ताराप ताराप गा ।
उदाहरणः
ना.वा. ऊर्फ रेव्हरंड टिळक ह्यांची एक अतिशय नादमय रचना आहे, माझ्या मातृभूमीचे नाव.
सृष्टी तुला वाहुनी धन्य माते, अशी रूपसंपन्न तू निस्तुला ।
तू कामधेनू ! खरी कल्पवल्ली, सदा लोभला लोक सारा तुला ॥
या वैभवाला तुझ्या पाहुनीया, मला स्फूर्ति नृत्यार्थ होई जरी ।

सामर्थ्य नामी तुझ्या आर्यभूमी, तसे पाहिले मी न कोठे तरी ! ॥