आचारसंहिता म्हणजे नेमकं काय ? काय करावं आणि काय करु नये..!!

Vidhan%2BSabha%2BAachar%2BSahita%2Binformation%2Bin%2Bmarathi

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलेलं आहे. विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. निवडणुकांच्या घोषणेसोबतच राज्यभरात आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता म्हणजे नेमकं काय? हा प्रश्न सर्वसामान्य मतदारांना पडलेला असतो. आचारसंहिता म्हणजे राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतरच्या काळात काय करावं आणि काय करु नये, यासंदर्भात आखून दिलेली नियमावली.

▪आदर्श आचारसंहितेचे नियम

❇ मतदारांना पैसे वाटणे, महागड्या भेटवस्तू देणे, मतदारांना आमिष दाखवणे अशा गोष्टी करण्यात आचारसंहितेच्या कालावधीत मनाई आहे. त्यामुळेच विद्यमान सरकारला कोणत्याही विकासकामाची घोषणा या काळात करता येत नाही. तसंच योजनांची अमंलबजावणीही बंद ठेवावी लागते.

❇ आचारसंहिता मंत्र्यांनाही लागू होते. त्यामुळे या कालावधीत कोणत्याही मंत्र्याला रस्ता, पाणी, वीज अशा विकास कामांची आश्वासनं देता येत नाहीत. तसंच निवडणुकीवर परिणाम होणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची आपल्या आवडीच्या ठिकाणी बदली करता येत नाही.

❇ आचारसंहितेच्या काळात कोणत्याही पक्षाला सरकारी वाहने, विमाने आणि हेलिकॉप्टरचा निवडणुकीच्या प्रचारासाठी वापर करता येत नाही. तसंच सरकारी मालमत्ता, सरकारी गेस्ट हाऊसमध्ये हक्कही गाजवता येत नाही.

❇ समाजात जाती, धर्म, वंश, भाषा याआधारे फूट पडेल किंवा वाद निर्माण होतील असं कोणतंही भाषण, प्रचार, घोषणा किंवा आश्वासनं उमेदवार आणि पक्षाने देण्यास मनाई आहे.

कोणताही प्रचार रात्री दहा वाजताच्या आतच संपवणं बंधनकारक आहे. अन्यथा, तो आचारसंहितेचा भंग ठरतो.

❇ कुठल्याही पक्षाला प्रतिस्पर्धी पक्षाच्या भाषणात, रॅलीत, प्रचारसभेत, मिरवणुकीत कुठल्याही प्रकारचा अडथळा आणण्यास मज्जाव आहे. त्या उमेदवाराची उमेदवारी निवडणूक आयोगाकडून रद्द होऊ शकते. लोकसभा निवडणूक 2019 च्या वेळी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये उसळलेल्या राड्यामुळे त्या मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्यात आली होती.

❇ नागरिकांच्या खाजगी मालमत्तेचा किंवा जमिनीचा विनापरवाना वापर कोणत्याही पक्षाला करता येत नाही.

▪आता हे झाल राजकारणाच्या मैदानात असणाऱ्या लोकांचे नियम. पण सामान्य माणसाचं काय?

❇ जन्म दाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी, आधार कार्ड, पासपोर्ट, लायसन्स, उत्पनाचा दाखला अशी बरीच काम करायला गेल्यानंतर, प्रशासकीय अधिकारी आचारसंहितेच कारण देऊन टाळतात आणि आपल्याला वाटत ही काम आचारसंहितेच्या काळात होत नाहीत. पण आचारसंहितेचा आणि या कामांचा कुठला ही संबंध नाही. अशी सगळी प्रशासकीय काम आचारसंहितेत करता येतात.

❇ फक्त सरकारी बाबू ही कारण देऊन वेळ मारून नेतात आणि आपली काम लांबणीवर पडतात. आचारसंहितेच्या काळात नागरिक म्हणून आपण ही सगळी काम करू शकतो. फक्त कुठल्या ही सरकारी योजनांचा लाभ आचारसंहितेत घेता नाही.