MPSC स्पर्धा परिक्षेचे स्पर्धात्मक स्वरूप कसे असते? नक्की वाचा!!

एमपीएससी स्पर्धा परिक्षेची तयारी करताना मित्रांनो स्पर्धात्मक स्वरूपाने विचार करावा लागतो. तुमची लहानशी चूक खूप महाग पडू शकते या सर्व गोष्टीची पुर्तता व्हावी यासाठी तर हा लेख लिहण्यात आला आहे.

 

एमपीएससी स्पर्धा परिक्षेची तयारी करताना

 

स्पर्धात्मक स्वरूप म्हणजे नेमके काय?

  • एमपीएससी परीक्षेचा विचार करतांना प्रारंभी `तिचे स्पर्धात्मक स्वरूप म्हणजे नेमके काय?’ या बाबीचा सखोल विचार करणे अत्यावश्यक ठरते. एमपीएससीची परीक्षा इतर रूढ परीक्षांचा विचार करता पुढीलप्रमाणे भिन्न ठरते.
  • प्रस्तुत भिन्नत्व अथवा वेगळेपणातच या परीक्षेचे स्पर्धात्मक स्वरूप दडले आहे. जितक्या लवकर आणि गांभीर्याने हे निराळेपण आपण लक्षात घेऊ त्यावरच या परीक्षेच्या तयारीची नेमकी दिशा अवलंबून राहील.
  • पहिले वेगळेपण म्हणजे यात पात्र (यशस्वी) होण्यासाठी आवश्यक गुण अथवा गुणाची टक्केवारी होय. इतर कोणत्याही रूढ परीक्षेत पात्र होण्यासाठी 35% अथवा फारतर 40% एवढी गुणमर्यादा निर्धारित केलेली असते.
  • एमपीएससीच्या बाबतीत मात्र पात्रतेसाठी असा पूर्वनिर्धारित गुणमर्यादेचा निकष आढळत नाही. त्या-त्या वर्षी आयोगाद्वारे भरल्या जाणाऱया पदसंख्येला विचारात घेऊनच परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर विशिष्ट विद्यार्थी पात्र ठरविल्या जातात.
  • एखाद्या वर्षी आयोगाने 500 पदे भरण्याचे जाहीर केल्यास त्यावर्षी पूर्वपरीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी अंतिमत: भरावयाच्या 500 पदांच्या साधारण 12 पट म्हणजे 6000 विद्यार्थी पूर्वपरीक्षेत पात्र ठरविले जातात. म्हणजेच 6000 विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवले जाते.
  • पुढे मुख्य परीक्षा दिलेल्या या 6000 विद्यार्थ्यांपैकी त्यावर्षी भरती करावयाच्या पदसंख्येच्या 3 पट (5003) म्हणजे 1500 विद्यार्थी या टप्प्यात पात्र ठरवले जातील आणि त्यांना मुलाखतीसाठी निमंत्रित केले जाते.
  • शेवटी मुलाखत दिलेल्या 1500 विद्यार्थ्यांपैकी 500 विद्यार्थ्यांची पात्र उमेदवार म्हणून निवड होईल. थोडक्यात त्या वर्षी आयोगाद्वारे भरल्या जाणाऱया पदसंख्येला मध्यवर्ती स्थान असते. म्हणूनच त्या पात्र विद्यार्थ्यांच्या `मॅजिक फिगर’ मध्ये येण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला इतरांशी स्पर्धा करून त्यांना मागे सारावे लागते. म्हणूनच ही परीक्षा एकीकडे इतरांशी तर दुसरीकडे स्वत:शीच अविरतपणे चालणारी स्पर्धा (परीक्षा) ठरते. आणि हेच या परीक्षेचे मूलभूत वेगळेपण आहे.

एमपीएससी स्पर्धा परिक्षेचे महत्वाचे तीन टप्‍पे

पहिला टप्पा :
  • एमपीएससी ची परीक्षा एकंदर तीन टप्प्यात आयोजित केली जाते, हे या परीक्षेचे दुसरे वेगळेपण होय. यात वस्तुनिष्ठ स्वरूपाची पूर्वपरीक्षा व मुख्यपरीक्षा (2012 पूर्वी राज्यसेवा मुख्यपरीक्षा ही विश्लेषणात्मक व लघुत्तोरी-दीर्घोत्तरी प्रश्नांची असायची) आणि तोंडी स्वरूपाची मुलाखत असे तीन टप्पे आढळतात.
  • अशा निरनिराळ्या स्वरूपाचे भिन्न टप्पे हे या परीक्षेचे खास वैशिष्टय़ मानता येते. पूर्व, मुख्य आणि मुलाखत (व्यक्तिमत्व चाचणी) यातील मुलाखतीचा तिसरा टप्पा हे या परीक्षेचे आणखी एक भिन्नत्व ठरते. वस्तुत: आयोगाने यास `व्यक्तिमत्व चाचणी’ असे नामाभिधान वापरले आहे.
  • उमेदवार प्रशासकीय जबाबदारी पेलण्यासाठी समर्थ आहे किंवा नाही याची तपासणी म्हणजे व्यक्तिमत्व चाचणी होय. अर्थात यात अधिकाधिक गुण प्राप्त व्हावेत यासाठी समग्र तयारीवर भर देणे गरजेचे ठरते.
दुसरा टप्पा :
  • परीक्षेच्या प्रत्येक टप्प्याची तयारी करण्यासाठी आयोगाने निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमाचे स्वरूप व व्याप्ती हे या परीक्षेचे पुढील वेगळेपण लक्षात आणून देते.
  • राज्यसेवा पूर्वपरीक्षेत `सामान्य क्षमता चाचणी’ या एकाच पेपरमध्ये एकूण सहा घटकांचा सविस्तर अभ्यासक्रम नमूद केलेला आहे.
  • राज्यसेवा मुख्य परीक्षेत अनिवार्य मराठी, इंग्रजी या भाषा पेपरसह इतिहास-भूगोल, राज्यघटना, मानव संसाधन विकास व मानवी हक्क आणि अर्थव्यवस्था-विज्ञान तंत्रज्ञान हे सामान्य अध्ययनाचे सविस्तर चार पेपर्स समाविष्ट केले आहेत.
  • मुलाखतीसाठी औपचारिकपणे अभ्यासक्रम निर्धारित केलेला नसला तरी व्यक्तीगत माहिती, शैक्षणिक पार्श्वभूमी, अभ्यासबाह्य बाबींतील रस, पदविषयक माहिती आणि चालू घडामोडी अशा घटकांवर मुलाखतीत प्रश्न विचारले जातात. स्वाभाविकच विविध अभ्यास शाखांशी संबंधित असलेला व्यापक अभ्यासक्रम हे नजरेत भरणारे एक निराळेपण ठरते.
तीसरा टप्पा :
  • अभ्यासक्रमात नमूद केलेल्या घटकांसंबंधी चालू घडामोडींचा अभ्यास हे या परीक्षेचे शेवटचे वेगळेपण मानता येते. राज्यसेवा पूर्वपरीक्षेत स्वतंत्रपणे चालूघडामोडीवर प्रश्न विचारले जातात. त्याखेरीज कला, वाणिज्य, अर्थव्यवस्था, कृषी आणि विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात घडणाऱया घडामोडीविषयी देखील प्रश्न विचारले जातात.
  • मुख्य परीक्षेच्या बदललेल्या अभ्यासक्रमाविषयी आयोगाने अशी एक स्पष्ट सूचनाच नमूद केली आहे की `अभ्यासक्रमात नमूद केलेल्या मुद्याविषयी विद्यार्थ्यांनी समकालीन व अद्ययावत माहितीशी अवगत असावे.
  • मुख्यपरीक्षेतही अनेक प्रश्न त्या-त्या घटकात घडलेल्या चालू घटना-घडामोंडीविषयी असणार हे नक्की! शेवटी मुलाखतीतही घटकराज्य, राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर घडणाऱया महत्त्वपूर्ण घडामोडीविषयी काही प्रश्न विचारले जातात.
  • परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यात महत्त्वपूर्ण असणाऱया या चालू घडामोडींची तयारी करण्यासाठी वर्तमानपत्रे, नियतकालिके आणि वार्षिकींचे नियमित व सखोल वाचन अत्यावश्यक ठरते.